9.17.2009

मुंबई नगरी (कविता)

मुंबई नगरीची किमया भारी
चोवीस तास चालते सारी
पुरूष असो वा तेथे नारी
सर्वांचीच असते नेहमीची वारी

पहाट झालेली काळत नाही
वर्दळ व्हायला सुरूवात होते
सूर्य उदयाच्या आत मध्येच
रस्ता दुतर्फा भरून वाहते

गरीब असो वा श्रीमंत
भेदभाव ही करतच नाही
कुणाचे येथे काही होऊ द्या
कुणालाच येथे गय नाही

दुधावाला पाववाला सकाळी सकाळी
घरोघरी जाऊन देतात आरोळी
कितीतरी जन या वेळी
नुसतीच पडून मारतात लोळी

सकाळपासून ते सन्ध्याकाळपर्यन्त
या नगरीत कस सुरळीत चालत
जशी गरज लागेल तशी
कुणीही कुणासही मदतीस बोलत

यंत्र गिरण्या तसेच कापड गिरण्यांचा
हल्ली र्‍हास होत आहे
जून ते सोने म्हणाणार्‍या संस्कृतीचा
नुसताच भास होत आहे

अशी ही मुंबई नगरी
कुठल्याही प्राप्त परिस्थितीशी तरतूद करते
कुणीही कसेही नियम लादले
आनंदाने त्याचा स्वीकार करते

पहाटे पासूनच चालू होते
बारा डब्यांची लोकल गाडी
पहिल्या पाळीला असणारे कर्मचारी
वेळ नियमांचा जपच पाडी

बॉस पासून प्युन पर्यंत
सर्वांना मुंबई आवडते खूप
पण हल्ली या मुंबईच
बर्‍याच गोष्टींनी बदललय रूप....

___________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment